Home Page

‘आपल्या बांधवांचा नेता होण्याची धडपड करू नका. त्यांचे सेवक बना, नेतेगिरीच्या या पाशवी प्रवृत्तीने
जीवनरूपी महासागरात अनेक मोठमोठी जहाजे बुडवून टाकली आहेत.’ स्वामी विवेकानंदांच्या अशा
विचाराकडे दुर्लक्ष करून भारतात भल्याभल्यांनी देशाचे मोठे नुकसान केले. पण ज्यांनी अशा विचारांची
कास धरली आणि समाजसेवेचे व्रत अंगिकारले अशा मोजक्याच थोर लोकांमध्ये मोठ्या आदराने मोहन
रानडे यांचे नाव घेतले जाते. सांगली येथून शालेय शिक्षण संपताच थेट गोव्यात जाऊन ते गोव्याच्या
स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले, नंतर १४ वर्ष पोर्तुगीजांचा…. तुरुंगवास भोगला. १९६९ साली तुरुंगातून
सुटून गोव्याच्या राजकारणात उतरण्याची व मोठी पदे, अधिकार उपभोगण्याची केवढी मोठी संधी
त्यांच्या समोर होती ! पण तू नाकारून त्यांनी समाजसेवेची निवड केली.

अनेक वर्ष गोव्यात कार्य केल्यानंतर, आयुष्याच्या उत्तराधार्त पुण्यात स्थायीक झाल्यावर वयाच्या
सत्तरीत त्यांनी ‘स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्था’ स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून
होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचे काम केले जात आहे. संस्थेने आपल्या
कार्याची १६ वर्षे पूर्ण केली आहेत. या काळातील संस्थेच्या कार्याचा हा आढावा वाचकांसमोर ठेवीत
आहे.

छात्रकल्याण योजना : या योजनेअंतर्गत गरीब हुशार विद्यार्थ्यंना महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत देते हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. छात्रकल्याण योजनेअंर्गत ही मदत महाविद्यालयाची शैक्षणिक फी, भोजनाचा खर्च, वह्या-पुस्तके, बस खर्च अशा स्वरूपात असते. विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन संस्थेची कार्यकारिणी विद्यार्थ्यांची निवड करते. संस्थेच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करणे शक्य झाले आहे. चांगल्या नोकऱ्या मिळवून स्थिरावलेले विद्यार्थी हळूहळू संस्थेच्या कार्यात सहभागी होऊ लागले आहेत, संस्थेचे सदस्यत्व पत्करत आहेत ही विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे अशा गुणी विद्यार्थ्यांचा संस्थेला अभिमानच वाटतो.